![Best-CBSE-School-In-Nashik](https://rudrathepraticalschool.com/wp-content/uploads/2023/04/teacher-and-students-in-classroon-vector-280x180.jpg)
पालक शाळेला एखादी पक्का माल तयार करणारी फॅक्टरी समजतात की ज्यात एका बाजूने कच्चा माल टाकून त्यावर प्रक्रिया करून दुसऱ्या बाजूने पक्का माल बाजारात विकण्यासाठी तयार होतो. त्यांना शाळा / कॉलेज कडून किंवा एखाद्या शैक्षणिक संस्थेकडून व शिक्षकांकडून त्याची हमी देखील हवी असते की या शाळेत / कॉलेजात किंवा क्लास मध्ये जर विद्यार्थ्यांचे ऍडमिशन केले तर तो तिथून बाहेर पडल्यावर मोठे पॅकेज घेऊनच बाहेर पडेल अशा अपेक्षा असतात. शिक्षण ही एकतर्फी प्रक्रिया नसून ती जेवढी शाळा व शिक्षक यांचेवर अवलंबून आहे तेवढीच विद्यार्थी व पालक यांचेवर देखील अवलंबून आहे हे समजून घेण्याची मानसिकता मात्र खूप कमी लोकांची दिसून येते. शिक्षण म्हणजे एक आदन प्रदान प्रक्रिया आहे. ज्यामध्ये प्रत्येक घटक हा तेवढाच महत्त्वाचा आहे. प्रक्रिया ज्या घटकावर होते तो घटक हा निर्जीव वस्तू नसून तो एक संपूर्ण इतरांपेक्षा वेगळी एकमेव अद्वितीय व्यक्ती आहे. जी तिच्या स्वतंत्र गतीने वेगवेगळ्या गोष्टी ग्रहण करते व समजून घेऊन त्याचा उपयोग वेगळ्या परिस्थितीत देखील करू शकते.
पालक आपला पाल्य, शिक्षक व शाळा यांचेवर शिक्षणासाठी सर्वस्वी जबाबदारी ढकलून मोकळा होतो. विद्यार्थी शॉर्टकट शोधून संपूर्ण मेहनत न घेता आपल्याला सर्व रेडिमेड तयार करून आपणास घास भरवतील ही अपेक्षा बाळगून शाळेत येतो. तर शाळा / कॉलेज व शिक्षक त्यांना फक्त अभ्यासक्रम शिकवून मोकळे होतात व राहिलेली जबाबदारी विद्यार्थी व पालक यांचेवर सोपवून मोकळे होतात. म्हणजे स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून प्रत्येक घटक दुसऱ्या घटकांकडून अपेक्षा बाळगून राहतो. परंतू जर शिक्षण प्रक्रियेत अतीशय उत्तम फलीताची अपेक्षा असेल तर विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षण व्यवस्था यांनी स्वतःची जबाबदारी ओळखून त्याप्रमाणे जाणीपूर्वक वागून विद्यार्थ्याच्या अपेक्षित प्रगतीकडे लक्ष केंद्रीत करून आवश्यक ते ते सर्व प्रयत्न केले तर आपल्याला अभिप्रेत सर्व काही आपण करू शकतो, फक्त गरज आहे ती परस्पर सहकार्य आणि समन्वय राखण्याची. परस्परांवर विश्वास ठेवण्याची आणि परस्परांच्या विश्वासास पात्र होण्याची. असे घडल्यास शाळा/कॉलेज विद्यार्थी आणि पालक यांना अपेक्षित परिणाम मिळाल्या वाचुन राहणार नाही.